पालखी सोहळ्यासाठी उत्कृष्ट नियोजन करावे

अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांच्या सूचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Channel Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 28 मे 2025। पुणे । आगामी आषाढी एकादशी यात्रा पालखी यात्रा सोहळ्यासाठी शासकीय अधिकार्‍यांनी पाणी, स्वच्छता, शौचालये, वारकर्‍यांसाठी आरोग्यव्यवस्था, औषधसाठा आदींची उत्कृष्ट व्यवस्था करावी; तसेच पालखी सोहळा प्रमुख आणि पदाधिकार्‍यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कामे तातडीने करावीत, अशा सूचना पुणे महसूल विभागाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिल्या.

विधानभवन येथे आयोजित आषाढी एकादशी यात्रा पालखी यात्रा पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पुणे पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील उपस्तित होते. तर दूरदृष्य प्रणालीद्वारे सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी तसेच विविध पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्रीमती कविता द्विवेदी म्हणाल्या, एकत्रित नियंत्रण कक्ष समन्वयाने सुरू राहील, सर्व अधिकारी परस्परांच्या संपर्कात राहतील असे नियोजन करावे. पालखी सोहळ्याला होणारी अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेर्‍यांचा उपयोग करावा. आवश्यक तेथे निरीक्षण मनोरे उभे करावेत. साखळी चोरीच्या (चेन स्नॅचिंग) घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. पार्किंगची व्यवस्था पुरेशी असेल याकडे लक्ष द्यावे. गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्य मार्गांच्या दुरुस्तीबरोबरच पालखी मार्गाला जोडले जाणारे कच्च्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांची कामे सुरू आहेत असलेल्या ठिकाणचा रस्त्यावरील राडारोडा काढणे, मुरुमीकरण करणे आदी उपाययोजना कराव्यात. वारकर्‍यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी टँकर भरण्यात येणार्‍या स्रोतांची तपासणी करावी आणि निर्जंतुकीकरणासाठी टीसीएलची व्यवस्था करावी. ते वापरासाठी वैध कालावधीतील असल्याची खात्री करावी. पालखी मार्गावरील दुकानातील खाद्यपदार्थांचे, पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी. वारकर्‍यांच्या जेवणानंतर उरणारे अन्नाचे व्यवस्थित विल्हेवाट लागेल जेणेकरून रोगराई पसरणार नाही हे पहावे.

यंदा मोबाईल स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यात आली असून त्यांच्या स्वच्छतेसाठी पुरेसे कर्मचारी नेमावेत. त्यांची जेट स्प्रे द्वारे नियमित स्वच्छता व्हावी. त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सतत उपलब्ध असतील याची दक्षता घ्यावी. स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचे टँकर, नियंत्रणकक्ष, भोजनव्यवस्था आदी सोयी- सुविधांची माहिती वारकर्‍यांना व्हावी यासाठी दिशादर्शक फलक (सायनेजेस) लावण्यात यावेत. पालखी काळात वाहतुकीसाठी रस्ते बंद केल्यास पर्यायी रस्त्यांची माहिती जनतेपर्यंत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाईल असे नियोजन करावे, आदी सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व सीसीटिव्ही कॅमेरांचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी काही पही विकसित करण्यात येणार आहेत. एकात्मिक नियंत्रण कक्ष उभा करण्यात येणार असून कक्षातील सर्व विभागांच्या प्रमुखांना वॉकी टॉकी देऊन संवाद व्यवस्था बळकट करण्यात येणार आहे. अपघात मुक्त वारी करण्यासाठी नियोजन केले आहे. पावसाचे प्रमाण पाहता दिंड्यांना वॉटरप्रुफ तंबू देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. खासगी कुटुंबांनी वारकर्‍यांसाठी आपली शौचालये वापरास देण्याची इच्छा दर्शवली आहे अशा घरांवर पांढरे झेंडे लाऊन पालखी सोहळ्यात माहिती देण्यात येणार आहे. रस्ते दुरुस्ती, फिरत्या शौचालयांची दुरुस्ती, पाण्याचे टँकरची व्यवस्था आदी माहितीही त्यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणालेे, पुणे जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर पालखीसाठी 1 हजार 800 टँकर, संत तुकाराम महाराज पालखीसाठी 1 हजार 200 तर संत सोपानदेव महाराज पालखीसाठी 200 टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखी मुक्कामी आरोग्य पथक, नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात येणार असून रुग्णवाहिका सोबत असणार आहेत. सार्वजनिक उद्घोषणा कक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वारकर्‍यांसाठी 3 हजार पालखी मेडिसीन किट पालखी सोहळा प्रमुखांकडे देण्यात येणार आहे. पोलीस विभागाला गर्दी वा वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ड्रोन कॅमेरे देण्याबाबतचे नियोजन होईल. पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था, गर्दी नियंत्रण, पर्यायी वाहतूक मार्ग, वाहतूक कोंडीवरील उपाययोजना आदींविषयी माहिती दिली.

यावेळी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिचंवड महानगरपालिका, महावितरण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांनी आपल्या तयारीची माहिती दिली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान ट्रस्ट, श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड, श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठण, श्री संत चांगावटेश्वर महाराज संस्थान सासवड आदींचे प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या.


Back to top button
Don`t copy text!