
स्थैर्य, मुंबई, दि.१३: दिवाळी आणि सुट्ट्यांच्या हंगामात रेल्वे गाड्या मर्यादित आहेत तसेच एसटीही फुल्ल होऊ लागल्या आहेत. याचा फायदा या खासगी बस चालकांनी तिकीट दर दिवाळीचा मुहूर्त साधून अव्वाच्या सव्वा केले आहेत. मुंबई ते नागपूर, औरंगाबाद, परभणी, कोल्हापूर, सावंतवाडी आदी सर्वच मार्गांवर खासगी बससेवांचे भाडे दीडपट ते दुप्पट वाढवण्यात आले आहेत.
दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत मुंबई व पुणे शहरातून खूप प्रवासी गावी जातात आणि परत येतात. त्या काळात खासगी प्रवासी बसेसव्दारे मोठ्या प्रमाणात अवाजवी भाडे आकारले जाते. त्याबाबत तक्रारी येत असतात. शासन निर्णयाच्या मयार्देपेक्षा जास्त भाडे आकारणा-या खासगी बसेसवर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई करावी, असे आदेश परिवहन उप आयुक्तांनी दिले आहेत. सण, सुट्ट्यांच्या हंगामात खासगी बसचालकांकडून जादा दर आकारले जाण्याची तक्रार कायम असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत भाडेवाढ केली नाही.