![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250211-WA0024.jpg?resize=780%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२५ | सातारा | पॅन, आधार किंवा बँक तपशील यासारखी संवेदनशील माहिती विचारणाऱ्या अज्ञात मोबाईल नंबरवरील लिंकवर कधीही ब्लिंक करु नका, विशेषत: केवायसी अपडेटच्या नावाखाली वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला कधीही उत्तर देऊ नका, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुरक्षित इंटरनेट कार्यशाळेत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, जिल्हा सूचना व प्रसारण अधिकारी संजीव कुलकर्णी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सायबर गुन्हेगारी वाढत आहे, या गुन्हेगारीला बळी पडू नये, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, सायबर गुन्हेगार हा ओटीपी, एटीएम कार्डच्या पाठीमागील कोडची माहिती विचारता असतात. आपण ओटीपी व एटीएम कार्ड वरील कोड सांगतो आणि फवणुकीला बळी पडतो. असे प्रसंग बऱ्याच व्यक्तींवर येतात. उच्च परताव्याचे आश्वासन देणाऱ्या ऑनलाईन गुंतवणूक ऑफरवरही विश्वास ठेवू नका.
चुकीच्या संकेतस्थळांना ॲक्सेस देवू नका. जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ऑफीसद्वारे कामकाज होणार आहे. धनादेश पद्धत बंद होणार असून थेट ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे जबाबदारी वाढणार आहे. कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉल समजावून घेऊन वापर करावा, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कार्यशाळेत सांगितले.