
दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । सातारा । सध्या व्हॉटस् अँप, फेस बुक अशा विविध समाज माध्यमांमध्ये कोरोना 19 (कोव्हिड) काळातील म्हणजेच मार्च 2020 या कालावधीतील जिल्हाधिकारी सातारा यांची धान्यवाटपाबाबतची जुनी ध्वनीचित्रफितीचा प्रसार होत आहे. ही ध्वनीचित्रफीत जुनी असल्यामुळे सद्यस्थितीत त्यातील घोषणा गृहीत धरणेत येऊ नये असे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
ही ध्वनी चित्रफीत जुनी असून त्या अनुषंगाने खालील प्रमाणे त्यातील घोषणेबाबत स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
या ध्वनी चित्रफितीमध्ये केशरी शिधापत्रिका धारक( प्राधान्य कुंटूब योजना कार्डधारक ) यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्रति व्यक्ती प्रति माह 2 किलो तांदुळ व 3 किलो गहू दिला जातो. या सोबत आता प्राधान्य कुंटूब योजना व अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति माह 5 किलो तांदुळ प्रति महिना माहे एप्रिल, मे व जुन महिन्यात मोफत देणेत येणारअसलेबाबत सांगितलेले आहे.
परंतु 31 मार्च 2022 चे सद्यस्थितीत प्राधान्य कुटुंब कार्ड धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्रति व्यक्ती 2 किलो तांदुळ व 3 किलो गहू दिली जाते. या सोबत आता प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति माह 2 किलो तांदुळ व 3 किलो गहू प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत माहे सप्टेंबर 2022 पर्यंत मोफत देय आहे.
ध्वनी चित्रफितीमध्ये सन 2020-21 कालावधीत मोठ्या प्रमाणावर कोरोना 19(कोव्हिड) चा प्रसार होत होता, त्यामुळे स्वस्तधान्य दुकानातील POS मशीन वर लाभार्थीचे फिंगर प्रिंटची गरज नसलेबाबत व फिंगर प्रिंट घेणेत येऊ नये अशी घोषणा करणेत आलेली होती. तथापि सद्यस्थितीत POS मशीन वर लाभार्थींचे फिंगर प्रिंट घेणे बंधनकारक आहे, त्याशिवाय धान्य वाटप करता येणार नाही.
या ध्वनीचित्रफितीत तत्कालीन तुरडाळ नियतन आदेश येणार असल्याचे सांगितले आहे तथापि 31 मार्च 2022 च्या सद्यस्थितीत डाळी बाबतीत शासनाकडून कोणतेही आदेश प्राप्त नाहीत.