
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कोळकी आणि हिंगणगाव गटात विचित्र चर्चा. राजे गटाचे उमेदवार मतदारांकडे फक्त ‘स्वतःसाठी’ एकाच मताची मागणी करत असल्याची कुजबूज. पॅनल डेंजरझोनमध्ये? वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. ०५ फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारतोफा आज सायंकाळी थंडावणार आहेत. मात्र, प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात फलटण तालुक्यातील राजकीय वर्तुळात, विशेषतः कोळकी (Kolki) आणि हिंगणगाव (Hingangaon) जिल्हा परिषद गटामध्ये एका वेगळ्याच गोष्टीची खमंग चर्चा रंगली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या गटांमध्ये राजे गट प्रणित शिवसेनेचे (Raje Group Shivsena) उमेदवार मतदारांकडे मतांची जोगवा मागत असताना, पॅनलचा प्रचार करण्याऐवजी “फक्त मलाच (एकच) मत द्या,” अशी छुपी विनवणी करत असल्याची माहिती समोर येत आहे.
“पॅनल गेलं खड्ड्यात, माझं बघा…”
साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार एकमेकांच्या हातात हात घालून ‘पॅनल’ म्हणून प्रचार करतात. मात्र, कोळकी आणि हिंगणगाव गटात चित्र काहीसे वेगळे असल्याचे बोलले जात आहे. या भागात विरोधाची धार पाहता, राजे गटाच्या जिल्हा परिषद उमेदवारांनी आपल्या सहकारी पंचायत समिती उमेदवारांना वाऱ्यावर सोडून दिल्याची कुजबूज सुरू आहे. “तुम्ही पंचायत समितीचे कोणालाही द्या, पण जिल्हा परिषदेचे ‘तेवढे’ एक मत मला द्या,” अशी भूमिका या उमेदवारांनी घेतल्याची चर्चा मतदारांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
पराभवाच्या भीतीतून ‘सेफ गेम’?
गेल्या काही दिवसांत कोळकी आणि हिंगणगाव परिसरात झालेली राजकीय स्थित्यंतरे, भाजप आणि महायुतीकडून झालेले जोरदार शक्तीप्रदर्शन आणि अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश यामुळे राजे गटाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संपूर्ण पॅनल निवडून आणणे कठीण असल्याचे लक्षात आल्यानेच, उमेदवारांनी ‘स्वतःचे आसन’ वाचवण्यासाठी ही ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून आणि चौकाचौकात वर्तवला जात आहे.
मतदारांमध्ये संभ्रम
नेहमी गटा-तटाच्या राजकारणावर भर देणाऱ्या राजे गटातच अशी फुटिरता आणि स्वार्थी राजकारण पाहायला मिळत असल्याने मतदारांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. जर नेत्यांमध्येच एकवाक्यता नसेल, तर मतदारांनी कोणावर विश्वास ठेवायचा? असा सवाल उपस्थित होत आहे.
अर्थात, ही केवळ चर्चा असली तरी, यात कितपत तथ्य आहे हे येत्या ०९ तारखेला निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. मात्र, या ‘एका मताच्या’ मागणीने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे, एवढे मात्र नक्की!
