
स्थैर्य, फलटण, दि. ०८ सप्टेंबर : फलटण तालुक्यासह मोठ्या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या नीरा खोऱ्यातील भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी ही चारही प्रमुख धरणे १०० टक्के भरलेली असून, एकूण पाणीसाठा ९९.९८ टक्क्यांवर स्थिर आहे. नीरा उजवा कालवा विभागाने आज (दि. ८) सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.
नीरा प्रणालीतील चारही धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता ४८.३३ टी.एम.सी. असून, आजमितीस धरणांमध्ये ४८.३२ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी हा साठा ४८.२० टी.एम.सी. (९९.७३ टक्के) होता. धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याने आणि धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
धरणांमधील आजची स्थिती:
- भाटघर: २३.५० टी.एम.सी. (१००%) – नीरा नदीत १,६२४ क्युसेक्स विसर्ग सुरू.
- वीर: ९.४१ टी.एम.सी. (१००%) – नीरा नदीत ४,६१३ क्युसेक्स विसर्ग सुरू.
- नीरा देवघर: ११.७२ टी.एम.सी. (१००%) – एकूण १,९२८ क्युसेक्स विसर्ग सुरू.
- गुंजवणी: ३.६९ टी.एम.सी. (१००%) – विसर्ग बंद.
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून पाण्याची आवक होत असल्याने नीरा नदीपात्रातील विसर्ग कायम आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.