
स्थैर्य, फलटण, दि. १ सप्टेंबर : नीरा खोऱ्यातील प्रमुख चारही धरणांमध्ये मिळून आजमितीला ९९.३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, संपूर्ण परिसर पाणीदार झाला आहे. भाटघर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, इतर धरणेही काठोकाठ भरलेली आहेत. पाण्याची आवक सुरू असल्याने, पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
नीरा उजवा कालवा विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुणवडी या चारही धरणांमध्ये मिळून ४८.०७ टी.एम.सी. पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी हा साठा ९९.१६ टक्के होता, त्यामुळे यंदाची स्थितीही अत्यंत समाधानकारक आहे. सध्या भाटघर धरण १०० टक्के, नीरा देवघर ९९.७४ टक्के, वीर ९९.१५ टक्के आणि गुणवडी धरण ९५.६६ टक्के भरले आहे.
धरणांमधील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी वीर धरणातून २,६५० क्युसेक्स वेगाने पाणी नीरा नदीत सोडण्यात येत आहे. तसेच, सिंचनासाठी नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येत आहे. मुबलक पाणीसाठ्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.