पावसाने ओढ दिल्याने नीरा खोऱ्यातील धरणसाठा किंचित घटला; एकूण साठा ९३ टक्क्यांवर

भाटघर धरण ९७ टक्के भरलेले; वीर धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर


स्थैर्य, फलटण, दि. १० ऑगस्ट : नीरा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने धरणांमधील एकूण पाणीसाठ्यात किंचित घट झाली आहे. नीरा उजवा कालवा विभागाने आज, दि. १० ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, सर्व प्रमुख धरणांमध्ये एकूण ९३.०९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

आजच्या अहवालानुसार, भाटघर धरण ९७.७९ टक्के (२२.९८ टीएमसी) भरले आहे. तर वीर धरणातील पाणीसाठा ९०.७४ टक्क्यांवर (८.५४ टीएमसी) आला आहे. निरा देवघर धरणात ९१.९४ टक्के (१०.७८ टीएमसी) आणि गुंजवणी धरणात ७३.०१ टक्के (२.६९ टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे.

पावसाने ओढ दिल्याने धरणांमधील पाण्याची आवक थांबली आहे. सध्या केवळ सिंचनासाठी कालव्यांद्वारे पाण्याचा वापर सुरू असल्याने पाणीसाठ्यात ही घट दिसून येत आहे. धरणसाठा समाधानकारक असला तरी, परतीच्या पावसापर्यंत पाण्याची पातळी टिकून राहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!