कल्पकता आणि मेहनतीची जोड देऊन भोईटे विश्वाची निर्मिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, फलटण, दि. ५ : शून्यातून विश्व निर्मिती म्हणजे काय याचा खरा अर्थ समजावून घेण्यासाठी आरडगाव, ता. फलटण या कायम दुष्काळी पट्ट्यातील छोट्या खेड्यातून मुंबईत आणि तेथून पुन्हा फलटण शहरात येऊन आपले नशीब आजमावताना त्याला बुद्धिकौशल्य, कल्पकता आणि मेहनतीची जोड देऊन सर्वांच्या एकजुटीतून अहोरात्र कष्टाने उभारलेल्या भोईटे विश्वाची, तेथील कौटुंबिक एकवाक्यतेची, सतत कष्ट उपसणाऱ्या प्रत्येकाची जीवनशैली अभ्यासावी लागेल.

उच्च शिक्षण व आदर्श संस्कार आवश्यक


स्व. आबाजी भोईटे व स्व. सजाबाई भोईटे या माता-पित्यांनी अरुण, अशोक, शामराव, नंदकुमार ही ४ मुले व सौ. सुमन व सौ. प्रभावती या २ मुली अशा मोठ्या कुटुंबाचा चरितार्थ मुंबईतील इलेक्ट्रिक दुकान व व्यवसायाच्या माध्यमातून चालविताना आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षण, आदर्श संस्कार आणि उत्तम आरोग्य लाभले पाहिजे याला प्राधान्य देत आपली वाटचाल सुरु ठेवली मुले वाढत होती, शिकत होती, सुसंस्कारित होत होती, त्या दरम्यान स्व. आबाजी भोईटे यांनी पत्नी सौ. सजाबाई भोईटे यांच्याशी चर्चा करुन आपला कुटुंब कबिला मुंबईतून फलटण येथे स्थलांतरित केला. पत्नी मुले फलटण येथे वास्तव्यास ठेवून त्यांचे शिक्षण व संस्काराची जबाबदारी पत्नीकडे होती.

नंदकुमार भोईटे यांनी आई वडिलांची कसरत हेरली


मुले शिकत मोठी होत असताना त्यापैकी सर्वात धाकटे चिरंजीव नंदकुमार भोईटे यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच एवढ्या मोठ्या कुटुंबाचा भार पेलवताना आई-वडीलांची होत असलेली कसरत पाहिल्यानंतर त्यांना त्यामध्ये मदत केली पाहिजे हे ओळखून भांडवलाशिवाय व्यवसाय कसा करावा या विवंचनेतून मुंबईचे भोईटे इलेक्ट्रिकल्सची शाखा येथे सुरु केली. व्यवसायातील अनुभव, प्रस्थापितांशी स्पर्धा, लगेच जम बसविणे कठीण होत असल्याचे लक्षात घेऊन अन्य व्यवसाय निवडण्याचा प्रयत्न करीत इलेक्ट्रिकल्स व्यवसायाची जबाबदारी थोरल्या बंधूंकडे सोपवून स्वतः शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून छोटी मोठी कॉन्ट्रॅक्टस मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना चांगले यश मिळत गेले, अनेकांचे सहकार्य, मार्गदर्शन आणि साथ लाभल्याने त्यांनी त्या माध्यमातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

अन्नधान्य वाहतूक, बालपोषण आहार जबाबदारी

महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्यांतर्गत अन्न धान्य वितरण विभागाचे धान्य वाहतुकीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली एकेक जिल्हा करीत २/३ जिल्ह्यातील अन्न धान्य वितरण व वाहतुकीची जबाबदारी घेतल्यानंतर त्यासाठी असलेली वाहने दुसऱ्यांकडून भाड्याने घेताना ते परावलंबी आणि अडचणीचे ठरु लागल्यानंतर स्वतःची वाहने असली पाहिजेत हे नक्की झाल्यानंतर आज भोईटे कुटुंबियांकडे स्वतःचे २०/२५ ट्रक असून त्या माध्यमातून अन्न धान्याची वाहतूक हा एक व्यवसाय उत्तम प्रकारे सुरु आहे.

त्याच्या जोडीला राज्य शासनाच्या शिक्षण विभागांतर्गत बाल पोषण आहार योजनेची जबाबदारी स्वीकारुन २/३ जिल्ह्यातील प्रा. शाळांना बाल पोषण आहार पोहोच करण्याची जबाबदारी भोईटे कुटुंबीयांनी स्वीकारली त्या माध्यमातून स्वतःचे ट्रक्स आणि मनुष्यबळ वापरुन नंदकुमार भोईटे यांनी स्वतः लक्ष घालुन प्रत्येक शालेलाच नव्हे प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार पोषण आहार मिळेल यासाठी विशेष मेहनत घेतली.

अरुणराव व सुपुत्र किरण व अजय यांच्यावर या विभागाची जबाबदारी

त्यानंतर एस टी च्या पार्सल विभागाचे खाजगी करणाचा निर्णय झाल्यानंतर त्याची जबाबदारीही अन्य एका सहकाऱ्या समवेत भोईटे कुटुंबीयांनी स्वीकारली त्यामध्ये यशस्वी होत आज हा संपूर्ण विभाग थोरले बंधू अरुणराव व त्यांचे चिरंजीव किरण व अजय यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

स्व. अशोकराव भोईटे यांचे सुपुत्र अमित भोईटे यांच्यावर हॉटेल अशोकाची जबाबदारी

भोईटे कुटुंबातील द्वितीय चिरंजीव अशोकराव भोईटे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून हॉटेल अशोका या नावाने लॉज नुकतेच सुरु करण्यात आले असून त्याला जोडूनच आज पासून व्हेज रेस्टॉरंट, बंकट हॉल, व डायनिंग हॉल सुरु करण्यात येत आहे. हॉटेल अशोकाची संपूर्ण जबाबदारी स्व. अशोकराव भोईटे यांचे सुपुत्र अमित भोईटे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सजाई गार्डन व ऋतुराजची जबाबदारी ऋतुराज भोईटे यांचेवर

तृतीय चिरंजीव शामराव भोईटे यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांचे सुपुत्र ऋतुराज भोईटे यांच्यावर सजाई गार्डन या शहरातील नामांकित, प्रशस्त आणि सर्वांच्या पसंतीला उतरलेल्या मंगल कार्यालयाची आणि शहराच्या मध्यवर्ती भागात एस. टी. बस स्थानकालगत, सुरु असलेल्या, फलटण करांनी नावाजलेल्या

हॉटेल ऋतुराजची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना सार्वजनिक क्षेत्रात आघाडी

स्वतः नंदकुमार भोईटे हे सर्व कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना सर्वांची एकजूट आणि एकवाक्यता याला प्राधान्य देऊन सर्व व्यापार, व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, कुटुंबातील प्रत्येकजण त्यांच्या विचारांचा आदर करीत आपली जबाबदारी निभावताना कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घेत कार्यरत असल्याने एक उद्योगशील यशस्वी कुटुंब म्हणून आज या कुटुंबाचा फलटण करांना अभिमान आहे.

प्रारंभीच्या काळात विद्यार्थी संघटना, नंतर आरडगावचे उपसरपंच, फलटणचे नगरसेवक, उपाध्यक्ष, नगराध्यक्ष असे गेली ३०/३५ वर्षे सक्रिय राजकारण व समाजकारणात असलेल्या नंदकुमार आबाजी भोईटे यांनी आपल्या बुद्धिकौशल्य व निर्णयक्षमतेच्या आधाराने सार्वजनिक जीवनातही अनेक चांगले, सेवाभावी, लोकांच्या हिताला प्राधान्य देणारे उपक्रम प्रभावी रीतीने राबविले आहेत.

डेक्कन चौक सुशोभीकरण व लोकार्पण

सलग ३५ वर्षे नगर परिषदेत निवडून जात असताना शहर विकासाच्या अनेक संकल्पना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यशस्वीरित्या राबविल्या आहेत, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज लोकार्पण होत असलेला डेक्कन चौक परिसर नामकरण व सुशोभीकरण होय.

फलटण तालुक्यात आलेल्या कृष्णेच्या पाण्याने संपूर्ण तालुका १०० % बागायत होत असताना, कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी, कमिन्स इंटरनॅशनल कंपनीची अनेक युनिट उभी रहात असताना झालेला औद्योगिक विकास, शिक्षण क्षेत्रात उभी राहिलेली नर्सिंग, कृषी, फलोद्यान, अभियांत्रिकी महाविद्यालये, नगर पालिका, बाजार समिती, सहकारी दूध संघ व गोविंद मिल्क प्रॉडक्टस सारख्या खाजगी संस्थांनी केलेली प्रगती शहरी भागातील उद्योगपती, व्यापारी, व्यावसाईक यांना भुरळ घालणारी ठरल्याने फलटण शहर व परिसरात शहरी लोकांची वस्ती वाढत असताना त्यांना आवश्यक नागरी सुविधा, हॉटेल्स, करमणूक साधने उपलब्ध करुन देण्याची गरज अनेकांनी चोखपणे हेरली आणि अनेक उद्योग सुरु केले, त्यापैकी एक चाणाक्ष उद्योजक म्हणून नंदकुमार भोईटे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!