काँग्रेस-राष्ट्रवादीकडे विधान परिषदेसाठी माणसे नाहीत म्हणून “वंचित’ची पळवली – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, अकोला, दि.८: ‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लायकीची माणसे नाहीत त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना पळवले,’ असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘वंचित’च्या तिकिटावर नांदेड लोकसभेची निवडणूक लढवलेले व सव्वा लाखाच्या जवळपास मते घेतलेले यशपाल भिंगे व चंद्रपूर येथून ‘वंचित’च्या तिकिटावर विधानसभा लढवलेले अनिरुद्ध वनकर यांची नावे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवली. अनलॉक ४ ची नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली. त्यात त्यांनी मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारचे ऐकायचेच नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मॉल, मदिरा सुरू केले आहे. तेथून कोरोना पसरत नाही आणि मंदिरे उघडली तर कोरोना कसा होईल, असा प्रश्न त्यांनी विचारला. आचार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आचार्य उपमुख्यमंत्री व आचार्य बाळासाहेब थोरात असा उपरोधिक नामोल्लेख करून या आचार्यांना हरिभक्त पारायण मंडळींची अ‍ॅलर्जी झाल्याचा आरोप अॅड. आंबेडकर यांनी केला.

लोकांना धार्मिक भावना जपण्याचा अधिकार


वंचित बहुजन आघाडी हिंदूंबाबत मवाळ होत आहे का, यावर प्रश्नावर अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, पक्ष म्हणून आम्ही सेक्युलर असलो तरी लोकांना अभिव्यक्तीनुसार धार्मिक भावना जपण्याचा अधिकार आहे. तो मिळवून देण्यासाठी आमची मंदिरे उघडण्याची लढाई सुरू आहे. राज्यातील हभपंनी मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारला वारंवार विनंत्या केल्या, पण राज्य सरकार ऐकत नाही, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!