दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
देशातील बहुचर्चित व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन आहे व हा प्रकल्प माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जावा, अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री व पंतप्रधान यांना भेटून व पत्राद्वारे केली होती. ती मान्य करून ही बुलेट ट्रेन माळशिरस-अकलूज-पंढरपूर मार्गे सोलापूरहून हैदराबादकडे जाणार आहे. बुलेट ट्रेनचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एनएचआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनला सादर करण्यात आला आहे. त्याचा पीफआर रिपोर्ट व डिपीआर रिपोर्ट झाला आहे. तसेच टेक्निकल सर्वे चालकविरहित विमानातून झाला आहे. रेल्वे मंडळाला डीपीआर सादर करण्यात आला आहे. लवकरच याला कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मंजुरीचे मुहूर्तमेढ लागून याला तांत्रिक मंजुरी मिळेल, असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
७११ किलोमीटरच्या मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर तयार झाला असून या बुलेट ट्रेनच्या कामाला रेल्वे मंत्रालयाचा सूचनेनुसार सुरूवात करण्यात येणार असल्याचे समजले आहे. प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबई-ठाणे-नवी मुंबई-लोणावळा-पुणे -बारामती-माळशिरस-अकलूज-पंढरपूर-सोलापूर -गुलबर्गा-विक्रबाद या मार्गे ही ट्रेन हैदराबाद येथे पोहचणार आहे. तसेच यामध्ये अकरा रेल्वे स्थानकांचा समावेश होणार आहे. यामुळे मुंबई ते हैदराबाद प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे या मार्गास देशाच्या रेल्वे इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. कारण महाराष्ट्र तसेच तेलंगाना, आंध्र प्रदेशच्या विकासात हा मार्ग मोलाचा ठरणार आहे. यामुळे माढा लोकसभा मतदार संघातील व सोलापूर जिल्ह्यातील आर्थिक वाहिनीच्या वाढीसाठी मदत होणार आहे. या भागातील बेरोजगारी हटविण्यासाठी व विविध व्यवसाय वाढीसाठी या रेल्वे मार्गाचा फायदा शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना होणार आहे.
७११ किलोमीटरच्या या मार्गावर प्रति तास ३५० किलोमीटरच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे, असा त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा वेग सरासरी २५० किमी प्रति तास असेल. रूळ स्टँडर्ड गेजचे असणार असून एका ट्रेनची प्रवासी क्षमता ७५० असणार आहे. आत्ता मुंबई-हैदराबाद प्रवास करण्यासाठी १४ तास लागतात. या बुलेट ट्रेनमुळे पैसा आणि वेळ लोकांचा वाचणार आहे. हा देशातील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याकारणाने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लवकरच शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटणार आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत चांगले काम करत असल्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून या देशाची सेवा उत्तमरीतीने घडावी व हा देश जगाच्या नकाशावर प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पंढरपूरचा विठ्ठल, तसेच अक्कलकोट स्वामी, तुळजापूरची आई तुळजाभवानी, म्हसवडचा सिद्धनाथ, शिंगणापूरचा महादेव तसेच अनेक मंदिरांना अभिषेक घालून या मंदिराचा प्रसाद घेऊन पंतप्रधानांना लवकरच भेटणार आहेत.