दैनिक स्थैर्य | दि. १ फेब्रुवारी २०२५ | नवी दिल्ली |
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्पात शेतकर्यांसाठी मोठी घोषणा करत किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केल्याची घोषणा केली. याचा देशातील १.७ कोटी शेतकर्यांना फायदा होणार आहे.
पंतप्रधान कृषी योजनेअंतर्गत अल्प भूधारक शेतकर्यांसाठी एक नवीन उपक्रम सरकार राज्य सरकारच्या सहकार्यातून सुरू करणार आहे. यासाठी देशातील १०० जिल्ह्यांमध्ये धनधान्य कृषी योजना राबविणार असल्याची घोषणाही सीतारमन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली.
अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की, केंद्र सरकार राज्यांसोबत पंतप्रधान धनधान्य कृषी योजना हाती घेईल. ग्रामीण तरुण आणि अल्पभूधारक शेतकर्यांच्या विकासावर केंद्राचे लक्ष्य राहणार आहे. कमी कृषी उत्पादकता, मध्यम पीक आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज असलेल्या १०० जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. पंतप्रधान कृषी योजनेतंर्गत पीक विविधीकरण, शाश्वत शेती पद्धती, पंचायत आणि ब्लॉक पातळीवर काढणीनंतर साठवणूक वाढवणे, सिंचन सुविधा आणि दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणे यामाध्यमातून कृषी उत्पादन वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. धनधान्य कृषी योजनेचा देशातील १.७ कोटी शेतकर्यांना फायदा होईल, असा विश्वासही अर्थमंत्री सीतारमन यांनी व्यक्त केला आहे.