
स्थैर्य, मुंबई, दि.४: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन होणारे राजकारण अद्यापही सुरूच आहे. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे होता. यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान आता भाजपच्या आमदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवत या प्रकरणी काही सवाल केले आहेत.
आता या प्रकरणात भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात ते म्हणाले आहेत की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास 65 दिवस मुंबई पोलिसांकडे होता. या कालखंडामध्ये ड्रगच्या संदर्भातील गंभीर व्हॉट्सअप चॅट उपलब्ध असताना देखील असे कोणते कारण होते की महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले? एवढी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र सरकारने दडवून का ठेवली ? असे सवाल कदमांनी ठाकरे सरकारला विचारले आहेत.
पुढे कदमांनी लिहिले आहे की, 65 दिवसांमध्ये एकालाही अटक केली नाही संपूर्ण देशाच्या युवा पिढीच्या दुष्टीकोनातून जो विषय अत्यंत गंभीर आहे असा ड्रग्सचा गंभीर विषय महाराष्ट्र सरकारच्या नजरेतून सुटला? का सरकारने मुद्दामून त्याकडे दुर्लक्ष केले? तसेच पुढे ते म्हणाले की, या प्रकरणात बड्या बड्या लोकांना वाचवण्याच्या कसरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही आणि म्हणूनच 65 दिवसांमध्ये कोणाची अटक किंबहुना हा ड्रगचा विषय समोर आला नाही. हा दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सराकारने का करावा? असा सवाल राम कदमांनी उपस्थित केला आहे.