
दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । मुंबई । पुरोगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप-शिवसेनेचे डबल इंजिनच योग्य पर्याय आहे,असे ठाम मत भाजपचे राष्ट्रीय नेते आनंद रेखी यांनी बुधवारी व्यक्त केले.ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण घालवले त्यांना सोबत घेवून सत्तास्थापन करण्याचा भाजपचा कुठलाही मानस नाही. बाहेरून आलेल्या नेत्यांनी त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत घरोबा करण्याचा सल्ला देणे योग्य नसल्याचे मत देखील रेखी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राला कणखर असे विरोधी पक्ष नेते लाभले आहे.कार्यकर्तृत्वाने ते सर्वसामान्यांच्या प्रत्येक समस्यांनावर आवाज बुलंद करीत महाविकास आघाडी सरकारला पुरून उरत आहेत. अशात सर्वसामान्य मतदारच फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर पुर्ण बहुमताने यंदा शिक्कामोर्तब करणार आहे. राज्यसभा निवडणुकीसह आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत देखील याची प्रचिती येईल, असा विश्वास यानिमित्ताने रेखी यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भाजप सोबत येण्याचे आवाहन केले होते.पंरतु, विविध नेत्यांकडून करण्यात येणारे हे आवाहन योग्य नाही.
भाजपची शिवसेनेसोबत आत्मीयतेची नाळ जुळली आहे. भाजप नेते शिवसेनेसोबत काम करण्यात अत्यंत ‘कम्फर्टेबल’ आहेत.मतभेद तर घरोघरी असतात. पंरतु, या भाजप आणि शिवसेनेत ‘मनभेद’नाहीत.
सेनेसोबत युती जरी तुटली असली,तरी हिंदुत्वासह विकासाच्या मुद्दयावर केवळ याच पक्षासोबतची युती योग्य असल्याचे रेखी म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब कितीही एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोप करीत असले तरी या दोघांमधील मित्रत्वच दोन्ही पक्षाला लवकरच एकत्र घेवून येईल,असे रेखी यांनी स्पष्ट केले आहे.