
स्थैर्य, मुंबई, दि. 11 : अमिताभ बच्चन हे देखील स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. मुंबईत अडकलेल्या जवळपास 700 मजुरांना अमिताभ बच्चन यांनी विशेष विमानाने त्यांच्या घरी उत्तर प्रदेशमध्ये पाठवलंय. अडकलेल्या या मजुरांसाठी बच्चन यांनी चार विशेष विमानांची व्यवस्था केली होती.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अडकलेल्या मजुरांसाठी अमिताभ बच्चन यांनी अजून दोन विमानांचीही व्यवस्था केली असून गुरूवारी ही विमानं उत्तर प्रदेशसाठी उड्डाण घेतील अशी माहिती आहे. बच्चन यांना अडकलेल्या मजुरांसाठी ट्रेनची व्यवस्था करायची होती, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. अमिताभ बच्चन यांच्या एबी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव हे बच्चन यांच्या निर्देशानुसार विमानांची व्यवस्था करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.
बुधवारी सकाळी मुंबईहून चार विमानांनी गोरखपूर, अलाहाबाद आणि वाराणसीसाठी उड्डाण घेतलं. प्रत्येक विमानात 180 प्रवासी होते. यापूर्वी गेल्या आठवड्यात बच्चन यांनी 1500 मजुरांना बसेसची व्यवस्था करुन घरी पाठवले होते. या बसेसने उत्तर प्रदेशातील लखनऊ, अलाहाबाद, गोरखपूर आणि भदोही आदी जिल्ह्यांशी संबंधित जवळपास 1500 मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते.