दैनिक स्थैर्य । दि.०८ एप्रिल २०२२ । सातारा । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करणेत आला होता.
या प्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती उपआयुक्त स्वाती इथापे यांच्या शुभहस्ते व समाज कल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करणेत आली.
यावेळी श्री. उबाळे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार व इतर योजनांचा लाभ घेवून आपली शैक्षणिक प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद श्रीम. घोळवे यांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेबाबत मार्गदर्शन केले. तर श्रीमती इथापे यांनी आपल्या परिसरातील अशिक्षित, वृध्द, दिव्यांग तसेच योजनांच्या लाभापासून वंचित लोकांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी असून सातारा शहरासारख्या ठिकाणी खोली भाडयाने घेवून राहणे व शिक्षण घेणे परवडणारे नाही, परंतू सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेल्या स्वाधार योजनेमुळे आम्हा विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ झाले आहे, अशी भावना व्यक्त केल्या.