अश्‍वमेध वाचनालयाचे ‘अक्षरगौरव’ साहित्य पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०४ फेब्रुवारी २०२२ । सातारा । येथील अश्‍वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्यावतीने कै. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय ‘अक्षरगौरव साहित्य पुरस्कार 2019 व 2020 ’ या दोन वर्षांच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या पुरस्कारांचे वितरण रविवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालयाचे संस्थापक व माजी सभापती रवींद्र भारती- झुटिंग यांनी दिली.

सन 2019 चे पुरस्कार प्रा. महेंद्र कदम, सोलापूर यांच्या ‘तणस’ व संजय ऐलवाड, पुणे यांच्या ‘वारुळ’ या साहित्यकृतीसाठी जाहीर झाले आहेत. प्रत्येकी रोख 2,500 रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांना प्रोत्साहनपर देण्यात येणारा पुरस्कार डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई यांच्या ‘फारद टेरेसा’ व प्रा. युवराज खरात यांच्या ‘गहिवरलेलं आभाळ’ या साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येणार आहे. तर डॉ. कृष्णदेव गिरी, कोल्हापुर यांच्या ’मार्शल योगा’ या पुस्तकास विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

सन 2020 चे पुरस्कार सुनिताराजे पवार, पुणे यांच्या ‘कांडा’ व ईश्‍वर हलगरे, गुहागर यांच्या ‘आरसा’ या साहित्यकृतीसाठी जाहीर झाले आहेत. प्रत्येकी रोख 2,500 रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांना प्रोत्साहनपर देण्यात येणारा पुरस्कार सतिश जाधव, यांच्या ‘करोनासुर’ व शुभांगी दळवी यांच्या ‘आनंदी’ या साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण प्राचार्य पुरुषोत्तम शेठ सर, व म.सा.प. पुणे प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांचे हस्ते होणार आहे. पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे.

यापूर्वी राज्यस्तरीय अक्षरगौरव पुरस्कार कवी संदीप खरे, व. बा. बोधे, कृष्णात खोत, परशुराम देशपांडे, वामन काळे, श्रीकांत घोंगडे, मंजूश्री गोखले, सुधीर गाडगीळ, विश्‍वास वसेकर, पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील, श्रीनिवास भणगे, उमा वि. कुलकर्णी, नवनाथ गोरे, संतोष वाटपाडे, सुप्रिया जाधव, सुनील जवंजाळ, डॉ. सुवर्णा नाईक- निंबाळकर यांना तर सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांना देण्यात येणारे पुरस्कार प्राचार्य यशवंत पाटणे, प्रा. सुहासकुमार बोबडे, आनंदा ननावरे, बाळासाहेब शिंदे, सौ. कांता भोसले, रवींद्र बेडकीहाळ, सौ. कादंबरी देशमुख, डॉ. विकास खिलारे, डॉ. संदीप श्रोत्री, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, प्रदीप कांबळे, प्रा. अजीत पाटील, डॉ. मानसी लाटकर, प्राचार्य मा. के. यादव, कु. रुपल पाटोळे या लेखकांना देवून सन्मानित करण्यात आले आहे. याच बरोबर कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकर, संस्कृती प्रकाशनाच्या सुनिताराजे पवार, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर तर अक्षरधारा वितरणाचे रमेश राठिवडेकर या मान्यवरांना प्रकाशन व वितरण क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांचे वितरण डॉ. अरुणा ढेरे, वैजनाथ महाजन, दत्तप्रसाद दाभोळकर, नागनाथ कोत्तापल्ले, गझलकार प्रदीप निफाडकर, प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानुगडे- पाटील, नाटककार अभिराम भडकमकर, ना. शेखर चरेगांवकर, डॉ. आ. ह. साळुंखे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, श्रीधर साळुंखे या मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास सातारकर साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष शशिभूषण जाधव व कार्याध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!