
दैनिक स्थैर्य | दि. 24 एप्रिल 2025 | फलटण | जम्मू काश्मीर येथे पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या आपल्या देशातील अनेक सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेच्या विरोधात प्रशासनाला निवेदन देताना भारतीय जनता पार्टी फलटण तालुक्याचे सर्व पदाधिकारी हे हसत हसत निवेदन देत आहेत, निदान या घटनेची तरी गांभीर्य ओळखून लाजा बाळगाव्यात असा घणाघाती आरोप युवा नेते प्रीतसिंह खानविलकर यांनी केला आहे.
युवा नेते प्रीतसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे घणाघाती आरोप केले आहेत.
यावेळी प्रसिद्धीपत्रकात प्रीतसिंह खानविलकर म्हणाले आहेत की, जम्मू काश्मीर येथे फिरायला गेलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी फक्त धर्म विचारत मारले आहे. सरकार कोणाचेही असो, यामध्ये तीव्र स्वरूपातील कारवाई होणे गरजेचे आहे. अश्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना याची सुद्धा जाणीव नाही. अशा घटनेचे निवेदन देताना दात काढत निवेदन देत आहेत. जरा जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगा, असा उपरोधिक सल्ला प्रीतसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.
भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुक्यातील असणारे पदाधिकारी यांना फक्त राजकारणात रस असल्याचे यामधून सिद्ध होत आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचे निवेदन देताना सुद्धा जर चेष्टा, मस्करी करत असतील तर या सारखी दुर्दैवी गोष्ट कोणतीही नाही, असे मत सुद्धा प्रीतसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केले आहे.