स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । नवी दिल्ली । महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणा-या ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठीच्या’ प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारांतर्गत दिल्लीसह बृह्नमहाराष्ट्रातील मराठी लेखक तसेच प्रकाशकांना ‘सरफोजीराजे भोसले बृह्ममहाराष्ट्र पुरस्कारासाठी’ महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार आहे.

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजने’अंतर्गत विविध साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. प्रकाशन वर्ष २०२१ करिता दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके आणि प्रवेशिका या स्पर्धेसाठी दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पाठविता येणार आहे.

एकूण ४ विभाग ,३५ साहित्य प्रकार आणि २९ लाख रूपये पुरस्कार राशी

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण चार विभागात ३५ साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रौढ वाड्.मय विभागात काव्यासाठी ‘कवी केशवसुत पुरस्कार’ (पुरस्कार राशी 1,00,000 रूपये), कादंबरीसाठी ‘हरी नारायण आपटे पुरस्कार’ (पुरस्कार राशी 1,00,000 रूपये) अशा एकूण 22 साहित्य प्रकारात प्रत्येकी १ लाख रुपये या प्रमाणे एकूण 22,00,00० रूपयांची पुरस्कार राशी आहे.

बाल वाड्.मय विभागात कवितेसाठी ‘बालकवी पुरस्कार’ (पुरस्कार राशी 50,000 रूपये), कादंबरीसाठी ‘सानेगुरूजी पुरस्कार’ (पुरस्कार राशी 50,000) अशा एकूण 6 साहित्य प्रकारात प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे एकूण 3,00,000 रूपयांची पुरस्कार राशी आहे.

प्रथम प्रकाशन प्रकारात काव्यासाठी ‘बहिणाबाई चौधरी पुरस्कार’ (पुरस्कार राशी 50,000 रूपये), नाटक एकांकिकेसाठी ‘विजय तेंडुलकर पुरस्कार’ (पुरस्कार राशी 50,000) अशा एकूण 6 साहित्य प्रकारात प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे एकूण 3,00,000 रूपयांची पुरस्कार राशी आहे.

‘सरफोजीराजे भोसले बृह्ममहाराष्ट्र पुरस्कार’ हा खास बृह्नमहाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. या श्रेणीत उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी साहित्याच्या सर्व प्रकारातील साहित्यकृती या पुरस्कारासाठी पाठविता येणार असून उत्कृष्ट साहित्यकृतीस ‘सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार’ (पुरस्कार राशी 1,00,000 रूपये) प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली पाठविता येणार आहे.

या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दूसरा मजला, सयानी रोड, प्रभा देवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच,बृह्ममहाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8, स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबाखडक सिंह मार्ग, नवी दिल्ली या कार्यालयातही स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका उपलब्ध आहे. याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार २०२१ नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

बृहन्महाराष्ट्र क्षेत्रातील विजेत्यांसाठी ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ (सर्व साहित्य) साठी निवड केली जाईल. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पेर्धसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.

ज्या लेखक व प्रकाशकांना या योजनेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी (मुंबईतील लेखक /प्रकाशकांनी) पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमून्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. मुंबई वगळता राज्यातील अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बृह्नमहाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांनी थेट महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मुख्य कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली या कार्यालयाकडे हे साहित्य व प्रवेशिका दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2022 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

पुरस्कारासाठीची प्रवेशिका व नियमावली या कार्यालयास प्राप्त झाली असून इच्छुकांना पाहण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी या कार्यालयात उपलब्ध आहे.


Back to top button
Don`t copy text!