स्थैर्य, मुंबई, दि.१२: जिओ प्लॅटफॉर्ममध्ये हिस्सा विकून सुमारे दीड लाख कोटी रुपये जमा केल्यानंतर मुकेश अंबानी आता आपली कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये हिस्सेदारी विकून मोठे भांडवल गोळा करण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्स रिटेलमध्ये साडेसात हजार कोटी रुपयंाची पहिली गुंतवणूकही आली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज आता केवळ कर्जमुक्त नाही तर तिच्याकडे रोकड भांडारही आहे. अशा स्थितीत नव्या दीड लाख कोटी रुपये गुंतवणुकीतून कंपनी अखेर करणार तरी काय, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात उपस्थित होऊ शकतो. कोटक इन्स्टिट्यूशन इक्विटीजच्या एका नव्या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज रिटेल आणि फायबर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टमध्येही हिस्सेदारी विकून भांडवल जमा करू शकते. कंपनी एवढ्या मोठ्या भांडवलाचा वापर केवळ भांडवल वृद्धीसाठी करणार नाही. अशा स्थितीत कंपनी आपली डिजिटल कॉमर्स, ५जी, फायबर-टू-द-होम म्हणजे एफटीटीएच आणि अन्य महत्त्वाकांक्षी योजनांत गुंतवणूक करू शकते. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज अन्य कंपन्यां खरेदी करण्यातही पैसा गुंतवू शकते. असे असले तरी कंपनीने फ्युचर रिटेलला २७ हजार कोटीहून जास्त रक्कम देऊन विकत घेतले आहे.
एसएसजे फायनान्स अँड सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक अतिश मातवाला यांच्यानुसार, रिलायन्स रिटेलची हिस्सेदारी विकून मिळणाऱ्या रकमेतील एक मोठा हिस्सा अंबानी रिलायन्सचा व्यवसाय बळकट करण्यासाठी करू शकतात. मोठी रक्कम हाती असल्यामुळे ते फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांनी सुरुवातीस दिलेल्या सवलतीच्या ऑफर करू शकतील. मातवाला म्हणाले, रिलायन्स आॅनलाइन रिटेल, ऑफलाइन रिटेल व ऑनलाइन तीन श्रेणींत क्रमांक एक होण्याचा प्रयत्न करेल. यासाठी रिलायन्स रिटेल वेगवेगळ्या रिटेल स्टार्टअप्सचे अधिग्रहण करू शकते.