नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर सर्व यंत्रणा सज्ज – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२३ । मुंबई । राज्यात येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर २४ x ७ नियंत्रण कक्ष सुरु आहे. नदीच्या पुरामुळे नदीने बाधित गावांना सर्तकतेचा इशारा स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्याला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सचेत प्रणालीद्वारे राज्यस्तरावरून पूर्व इशारा म्हणून सूचित करण्यात आले आहे. गडचिरोली १५ लाख, रायगड ४० लाख तसेच वर्धा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पूरप्रवण क्षेत्रांतील नागरिकांना इशारा दिलेला आहे. बचाव पथक व जिल्हाधिकारी कार्यालय हे सातत्याने समन्वय ठेवून हवामानाचा अंदाज व सद्य:स्थिती व स्थानिक स्थितीचे आकलन करुन बचाव पथके तैनात केलेली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १८ नागरिकांना निवारा क्षेत्रात हलवले होते. आता पूर परिस्थिती सामान्य झाल्याने त्यांना मूळ गावी पाठविण्यात आले. भामरगडमधील गडचिरोलीतील १,६८४ गावांपैकी १०० गावे पुलावर पाणी आल्याने संपर्कात नाही. भामरगड तालुक्यातील गावे आहेत. एसडीआरएफचे एक पथक तैनात आहे. ३१ जवानांपैकी १ उपनिरीक्षक व ८ जवान मिळून एक पथक असे तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केली आहेत. रत्नागरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड येथील एकूण ८७, रायगड येथील ९९१, ठाणे जिल्ह्यातील ४५८ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

सद्य:स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे व रायगड रसायनी या भागात पूर परिस्थिती आहे. बचाव पथके कार्यरत असल्याने जीवितहानी झाल्याची नोंद नाही. राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे. मात्र, सद्यस्थितीत गडचिरोली, रायगड व रत्नागिरी जिल्हे वगळता उर्वरीत जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. पूर परिस्थितीबाबत बचाव कार्यासाठी म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या पथकांना आपत्कालिन परिस्थितीकरिता पूर्व तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथक पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई तर, एसडीआरएफची पथके गडचिरोली, नांदेड येथे तैनात केली आहेत, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २० जुलै २०२३ रोजी रेड अलर्ट असलेले जिल्हे निरंक असून ऑरेंज अर्लट असलेले जिल्हे रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, पुणे असे आहेत.

चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया (ऑरेंज अलर्ट म्हणजे २४ तासांत जर ११५ ते २०४ मि.मी. पाऊस एका ठिकाणी पडत असल्यास ऑरेंज अलर्ट म्हटले जाते.) म्हणून त्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी बचाव पथकासह तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. २१ जुलै २०२३ रोजी रेड अलर्ट निरंक असून ऑरेंज अलर्ट – रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे या जिल्ह्यात असून २२ जुलै २०२३ रोजी रेड अलर्ट – निरंक असून- रायगड, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

जलसंपदा अंतर्गत असणाऱ्या धरणातून सोडणाऱ्या विसर्गाचे नियंत्रण केले जात असून अतिवृष्टी पूर व धरणातून विसर्ग यामध्ये प्रभावी संनियंत्रण व विभागामध्ये समन्वय ठवून जीवित व वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. होणाऱ्या नुकसानीचे सर्वेक्षण हे शासनाच्या प्रचलित स्थायी आदेशानुसार करण्याचे निर्देश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. चिपळूण मधील वाशिष्टी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलंडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राजोली, हालेवारा, एटापल्ली या गावातील लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

रायगड व गडचिरोली, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्याने पूर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे या जिल्ह्याची उद्याची स्थानिक स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेतील. गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस झालेले ०५ जिल्हे मुंबई शहर (९८.४), रायगड (१६३), सिंधुदुर्ग (११८.६), रत्नागिरी (९३), ठाणे (८०.४) असे आहेत, अशी माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!