
स्थैर्य, फलटण, दि. 8 मार्च : एकेकाळी साध्या-साध्या दाखल्यांसाठी आणि महसुली कामांसाठी सामान्य जनतेला प्रशासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत होते. गेल्या काही वर्षात ‘प्रलंबित कामे’ हा जणू फलटणकरांच्या पाचवीला पुजलेला शाप होता. मात्र, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ‘व्हिजन’मधून आणि आमदार सचिन पाटील यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीतून आता ‘शासन थेट जनतेच्या दारी’ आले आहे. आज साठे व राजळे (ता. फलटण) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा क्र. १) ची अत्यंत दिमाखात सुरुवात झाली.
लालफितीचा कारभार संपुष्टात
दिनांक ७ मार्च ते १४ मार्च या कालावधीत फलटण तालुक्यात या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. आज साठे आणि राजळे गावात या अभियानाचा शुभारंभ आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थेट गावात येून शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना जागेवरच दिला. तसेच शेकडो नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. लालफितीच्या कारभारात अडकलेली सामान्य माणसांची कामे आता ‘चुटकीसरशी’ मार्गी लागत असल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.
महायुती सरकारचा विकासाचा अजेंडा
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार सचिन पाटील यांनी अत्यंत तळमळीने आवाहन केले. “महायुती शासनाने सामान्य जनतेसाठी हे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान राबवले आहे. नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थाशिवाय आपली सर्व प्रलंबित कामे या शिबिराच्या माध्यमातून त्वरित पूर्ण करून घ्यावीत,” असे ते म्हणाले. रणजितदादांनी नेहमीच प्रशासनावर वचक ठेवून जनतेची कामे वेळेत करण्याची जी कार्यसंस्कृती रुजवली आहे, तीच संस्कृती आमदार सचिन पाटील ग्रामीण भागात यशस्वीपणे राबवत आहेत.
प्रशासनाचा मोठा फौजफाटा दिमतीला
या महत्त्वपूर्ण शिबिरासाठी महसूल विभागाचा मोठा फौजफाटा गावात हजर होता. फलटणच्या उपविभागीय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्यासह सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजप सरचिटणीस जयकुमार शिंदे आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत साठे व राजळे परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी जागेवरच लाभ घेतला. केवळ आश्वासने न देता, प्रत्यक्ष कृतीतून ‘विकास’ आणि ‘प्रशासन’ जनतेच्या दारात पोहोचवण्याचा हा ‘रणजितदादा’ पॅटर्न आता संपूर्ण तालुक्यात हिट ठरत आहे.
