
स्थैर्य, सातारा, दि. 9 डिसेंबर : बसस्थानकपरिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत अपघातही वाढले होते. या घटना रोखण्यासाठी मुख्य बसस्थानकाबाहेरील रस्ता दुभाजक बंद करून वाहतुकीत बदल करण्यात आला होता. मात्र, काही वाहनचालक शाहू स्टेडियम व बसस्थानक येण्यासाठी नो एन्ट्रीमधून येत आहेत. त्यामुळे या ठिकाणीअपघाताची शक्यता असून, बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे.
मुख्य बसस्थानकाबाहेर रस्तादुभाजकामधून बस व खासगी वाहने स्थानकात येत असल्याने परिसराला बेशिस्तीचे ग्रहण लागत होते. त्यामुळे या परिसरातील कोंडी काही प्रमाणात कमी करण्यासाठी नव्या वाहतूक रचनेनुसार बसस्थानकात येणार्या बस भूविकास चौकातून पुन्हा वळण घेऊन बसस्थानकात येणारी वाहतूक सुरू करण्यात आली होती.
सुरुवातीला चारचाकीसह दुचाकीवाहने नियम पाळून भूविकास चौकातून येत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून शाहू स्टेडियम व बसस्थानकात येणार्या दुचाकी उलट्या दिशेने येत आहेत. या प्रकारामुळे अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणार्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

