
स्थैर्य, 5 फेब्रुवारी, सातारा : श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सज्जनगड येथील दास नवमी संगीत महोत्सवांमध्ये बहारदार अशा सुश्राव्य कीर्तनात समर्थ भक्तांना अक्षरशः दोन तासाची सुश्राव्य अशी कीर्तनाची पर्वणीच मिळवून दिली.
माजलगाव ,बीड येथील ह.भ.प.लक्ष्मीप्रसाद पटवारी -कुलकर्णी यांनी आपल्या कीर्तन सेवेचा प्रारंभ संत तुकाराम महाराज यांच्या ..अंगीकार केला ज्याचा नारायण, निंद्य तेही तेणें वंद्य केले.. हा अभंग घेतला होता .जीवनामध्ये भक्तीप्राप्त झाल्यावर लौकिक दृष्टीने जरी आपल्याजवळ नींद्यत्व असले तरी पण ते नाश पावते ,आणि त्यासाठी नारायणाची कृपा आवश्यक आहे .अंगीकार केल्यानंतर आपल्याकडे वंद्यत्व येते. भजनाने भक्तीने सर्व पापे दूर होतात असे सांगत याप्रसंगी उत्तर रंगांमध्ये प्रज्ञाचषु परमपूज्य गुलाबराव महाराज यांच्या कृपेने तृप्त आणि पापमुक्त झालेल्या त्यांच्या शिष्या हिराबाई यांचे चरित्र अतिशय सुरेखपणे रंगविले. जीवन पापाने भरलेले असतानाही महाराजांच्या आज्ञेने ज्ञानेश्वर माऊली यांचा नामाचा ध्यास घेऊन तिच्या आयुष्यातील सर्व पापे नाश करून तिला भगवत प्राप्ती कशी करून दिली याचे अतिशय सुरेख आख्यान रंगवले,
लक्ष्मीप्रसाद यांनी सज्जनगड येथील उपस्थित समर्थभक्तांना अक्षरशः दोन तासाची सुश्राव्य अशी कीर्तनाची पर्वणीच मिळवून दिली. याप्रसंगी लक्ष्मीप्रसाद यांना ऑर्गनवर साथ सुशील गद्रे यांनी केली तर तबला साथ अभिनव जोशी यांनी केली.
उद्या दि.6 व 7 फेब्रुवारी रोजी पनवेल येथील ह. भ .प. नंदकुमार कर्वे बुवा यांचे कीर्तन होणार आहे तसेच गायन सेवेत सायंकाळी साडेसहा वाजता ठाणे येथील सौ.श्रुती गोडबोले व श्रद्धा जोशी यांचे सुश्राव्य गायन होणार असून त्यांना तबला साथ सुहास चितळे,पखवाजावर गणेश मेस्त्री,संवादिनीवर हर्षल काटदरे,ऑर्गनवर सुशील गद्रे व व्हायोलिनवर उदय गोखले यांची साथ राहणार आहे.
