
स्थैर्य, दि.२२: कोरोनामुळे १० एप्रिलनंतर अनेक देशांत लॉकडाऊन सुरू झाले. लोकांना जबरदस्तीने घरी राहणे भाग पडले आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. परिणामी, जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था कोलमडली. जागतिक स्तरावर जीडीपीचा दर २० टक्क्यांनी कमी झाला. आता अनलॉकनंतर अर्थव्यवस्था हळूहळू सावरत आहे. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपीची दरवाढ ७% पेक्षा जास्त असावी, असे तज्ञांना वाटते. जीडीपी सामान्य स्तरावर येण्यास खूप काळ लागेल, असे सरकारांना वाटते. लोक अजूनही घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. ग्राहक व कंपन्या दोघेही अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या काळात कोणीही गुंतवणूक करण्यास तयार होत नाही. गोल्डमॅन सॅक बँक यांच्या मते, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत असल्याने जागतिक जीडीपी वृद्धिदर ७-८ टक्क्यांनी घसरू शकतो. तज्ञांच्या मते, जगातील अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करायची असेल तर गुंतवणूक वाढली पाहिजे, अन्यथा भविष्यात भांडवल उभारण्यास अडचण उद््भवू शकते. कोरोनाची लस बाजारात येईपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येणे शक्य नाही असे तज्ञांनी सांगितले.
फेडरल रिझर्व्हच्या मते, लॉकडाऊनपूर्वी अमेरिकेत बेरोजगारीचा दर ४ टक्के होता. लॉकडाऊननंतर ढासळलेली परिस्थिती पूर्ववत होण्यास २०२३ वर्ष उजाडेल. तोपर्यंत बेरोजगारीत आणखी भर पडेल. यासंदर्भात गोल्डमॅन सॅकचे तज्ञ सांगतात, जर हीच परिस्थिती कायम राहिल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी २०२५ पर्यंतचा कालावधी लागू शकतो. जर आता गुंतवणूक वाढली नाही तर भविष्यात भांडवल उभारण्यास अडचण येईल. यामुळे बेरोजगारीचा दरही वाढेल. वस्तू व सेेवा क्षेत्रातील परिस्थितीबाबत जे.पी. माॅर्गन चेंज बँकेच्या मते, वस्तू तर विकल्या जात आहेत. लोक लॅपटॉप, फोन, जिमचे साहित्य आदींची खरेदी करत आहेत. यामुळे लोकांना घरी बसून लोकांच्या संपर्कात राहणे शक्य होते. परंतु हॉटेल-रेस्तरां, वाहतूक क्षेत्र यासारख्या सेवा उद्योगाची घसरण साथरोगाच्या काळात आधीपेक्षाही खालच्या पातळीवर गेली आहे. सेवा क्षेत्रावरील अवलंबित्व लोक बाहेर पडण्यावर असते. परंतु, या क्षेत्रावर याचा वाईट परिणाम झाला आहे. २०२० मध्ये एकमेव चीन वगळता सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेत जीडीपीचा वृद्धी दर घटत चालला आहे. आपतकाळात सर्व देशांचा वृद्धी दर खाली घसरत जातो. परंतु उणे जीडीपी असलेल्या या देशांत साथरोगानंतर जीडीपीच्या दरवाढीचे अंतर खूप जास्त दिसून येते. साथरोगात जी-७ देशांचा जीडीपीच्या वृद्धिदराच्या चांगल्या व वाईट कामगिरीचा फरक ६ टक्के होता. तो आजवर पाहण्यात आला नाही.