दैनिक स्थैर्य | दि. ८ जुलै २०२३ | फलटण |
नीरा उजवा कालवा बंद असल्याने व सुधारित जलकेंद्र येथील साठवण तलावातील पाणीपातळी कमी झाल्याने फलटण शहरात रविवार, दि. ०९ जुलै २०२३ पासून पाणी पुरवठ्यामध्ये ३० टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण नगर परिषद वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी दिली आहे.
जुलै महिना मध्यावर आला तरी सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील पाणीपातळी कमालीची घटली आहे. फलटण तालुक्यातही अत्यल्प पाऊस झाला असून पाणीपुरवठा करणारे तलाव, विहिरी आटल्या आहेत. नीरा उजवा कालवा बंद असल्याने फलटण शहराला पाणीपुरवठा करणार्या सुधारित जलकेंद्र येथील साठवण तलावातील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे उद्यापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात करण्यात आली आहे. फलटणमधील सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी केले आहे.