
सातारा – पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील. त्यावेळी कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे व इतर.
स्थैर्य, 21 फेब्रुवारी, सातारा : कृषी विभागामार्फत सातारा येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात 20 व 21 फेब्रुवारी या कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात शेतकर्यांनी उत्पादित केलेली विविध कृषी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली असून याचा लाभ सातारा वासियांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
महोत्सवामध्ये ज्वारीच्या विविध वाणांचे धान्य त्यामध्ये मालदांडी, सुपर मोती, परभणी मोती, फुले रेवती व फुले सूचित्रा परळी खोर्यातील देशी नाचणी, तांदूळ, जावळीची नाचणी, मान व खटावची बाजरी, मूग व ज्वारी उपलब्ध होणार आहेत. कडधान्यांमध्ये जात्यावर दळलेली मुग, उडीद, काळ्या घेवड्याची डाळ तसेच हिरवा मूग, हुलगे आदी महोत्सवामध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईची सेंद्रिय हळद तसेच मिलेटचे विविध पदार्थ त्यामध्ये विविध प्रकारच्या, नाचणीच्या शेवया, नाचणीचे इडली पीठ, उडीद लाडू, नाचणी अंबिल तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ आदी वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
